'त्या' प्रकरणाबाबत अण्णा म्हणाले, सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नही


माय नगर वेब टीम
पारनेर - न्यायव्यवस्था ही आपल्या देशातील सर्वोच्च व्यवस्था आहे. जळगाव घरकूल घोटाळ्यातील आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावल्याने जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल.’ असे मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.


जळगाव घरकूल घोटाळ्यासंदर्भात आलेल्या निकालाबाबत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले असून माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयाने दोषी धरले आहे. याबाबत अण्णा हजारे म्हणाले, कायद्यापुढे सर्व समान आहेत. मग तो कितीही मोठा असो. उशिरा का होईना, पण न्याय हा मिळतोच हे आज न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सिद्ध झाले आहे. ‘सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं’. सदर भ्रष्टाचार प्रकरणात आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा केला. जन आंदोलनाच्या माध्यमातून दीर्घकाळ संघर्षही केला. सरकार जैन यांच्यासह इतर भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करत नसल्याने मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण केले. त्यामुळे सरकारने माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचा चौकशी आयोग नेमून चौकशी केली. त्यात जैन यांचा गैरव्यवहार पुराव्यासह सिध्द झाला.

या प्रकरणी धाडसाने गुन्हा दाखल करणारे तत्कालीन महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह गेडाम, या गुन्ह्याचा निष्पक्ष व धाडसाने सखोल व बारकाईने तपास करून गुन्हाची मुळापर्यंत उकल करून आरोपपत्र दाखल करणारे अधिकारी इशू सिंधू तसेच या खटल्यात न्यायालयात सरकारी बाजू प्रभावीपणे मांडणारे प्रविण चव्हाण यांना आजच्या निकालाचे श्रेय जाते व मी त्याचे अभिनंदन करतो. सदर गुन्हाचा तपास एवढा प्रभावी झाला की तपासादरम्यान सुरेश जैन यांना साडेतीन वर्षे जेल मध्ये रहावे लागले, असेही अण्णा म्हणाले .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post