कर्जत – जामखेडला रोहित पर्व ; बेरोजगारांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन


माय नगर वेब टीम
जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दुष्काळी भागातील कर्जत- जामखेड या तालुक्यांमधील युवक- युवतींसाठी येत्या ३० ऑगस्ट, २०१९ रोजी भव्य सृजन नोकरी मार्गदर्शन व कौशल्य विकास मेळावा होणार असून या मेळाव्यात राज्यातील नामवंत बड्या कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात कंपन्याचे अधिकारी थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमांतून दुष्काळी भागातील हजारो युवक युवतींच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने या मेळाव्याविषयी तरूणाईमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मेळाव्यामुळे कर्जत- जामखेड मतदारसंघात रोहित पर्व सुरु जाले असल्याचे बोलले जात आहे.


रोहित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात सामाजिक कामांच्या माध्यमांतून सक्रीय आहेत. या भागातील जनतेशी संवाद साधत असताना बेरोजगार युवक- युवतींनी नोकरीची समस्या मोठी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. या प्रश्नावर रोहित पवार यांनी गांभीर्याने लक्ष घालत राज्यातील काही बड्या कंपन्यांशी संपर्क साधत दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची संधी मिळवून देण्याकरिता प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बड्या कंपन्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात होणा-या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार येत्या ३० ऑगस्ट रोजी कर्जत शहरातील दादापाटील महाविद्यालय येथे सृजन नोकरी मार्गदर्शन व कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सृजन आयोजित रोजगार मेळाव्यात पुणे, मुंबई, सोलापूर, बारामती, अहमदनगर, औरंगाबाद तसेच राज्यातील नामवंत ५० पेक्षा जास्त बहुराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या सहभागी होणार असून रिटेल, मॅनुफॅक्चरिंग, बँक, ऑफिस, मार्केटिंग, बँकिंग, केपिओ / बिपिओ, नर्सिंग, फायनान्स आदी क्षेत्रातील कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे. युवक- युवतींना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे तसेच अनुभवाप्रमाणे नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


मेळाव्यातच पात्र युवक युवतींना नियुक्तीपत्र दिले जाणार – रोहित
सतत पडणारा दुष्काळ आणि उच्च शिक्षण घेऊनही युवकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे कर्जत- जामखेड तालुका व परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरी मार्गदर्शन व कौशल्य विकासासंबंधी संधी उपलब्ध करून त्यांनी आर्थिक सुबत्तेच्या दिशेने वाटचाल करावी यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविला जात आहे. या मेळाव्यामध्ये पात्र उमेदवारांना उपलब्ध संख्येनुसार जागेवरच कंपनीच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत-जास्त युवक युवतींनी या सृजन नोकरी मेळाव्यात सहभागी व्हावे आणि आपले भवितव्य उज्ज्वल करावे, असे आवाहन युवा नेते रोहित पवार यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post