मुंबई: कोहिनूर स्क्वेअरप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी पाठिंबा जाहीर केला असतानाच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही त्यांची पाठिशी उभे राहिले आहेत. उद्याच्या चौकशीतून काही निघेल असं मला वाटत नाही, असं वक्तव्य करून उद्धव यांनी राज यांची अप्रत्यक्ष पाठराखणच केली आहे.
राज यांना ईडीनं नोटीस बजावली असून, २२ ऑगस्टला चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. यावरून मनसेचे कार्यकर्ते सुरुवातीला कमालीचे आक्रमक झाले होते. चौकशीच्या दिवशीच ठाणे बंद करण्याचा आणि ईडीच्या कार्यालयावर धडकण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, राज यांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी भूमिका बदलली आहे. 'ठाणे बंद'चा इशारा मागे घेतला आहे. राज यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळं मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांच्या नेत्यांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राज यांच्या ईडी चौकशीबाबत उद्धव यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता, उद्याच्या चौकशीतून काही निघेल असं वाटत नाही, असं ते म्हणाले.
Post a Comment