'तानाजी सावंतांची हकालपट्टी करा'


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी जिल्हा पातळीवरील राजकारणात पक्षाविरोधात भूमिका घेतल्याने शिवसेनेत सावंत यांच्याविरोधात वातावरण तापलं आहे. तानाजी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी करत सोलापुरातील शिवसैनिक आज थेट 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या अडचणवी वाढण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीऐवजी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये सावंतांविरोधात संतापाचे वातावरण आहे. दुसरीकडे सावंत यांना मंत्रिपद देण्याची मागणी करणारे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता तानाजी सावंत यांच्यावरही कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

सोलापुरातील शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी थेट मुंबई गाठली. 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसैनिकांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. उस्मानाबादमध्ये घडलेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आता या बैठकीला तानाजी सावंत उपस्थित राहणार का? याकडे लक्ष असणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post