बाळासाहेब ठाकरे यांनाही "भारतरत्न’ द्या
माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मी भक्त आहे. त्यामुळे त्यांना तर भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे. पण, कोणीही पुढे येण्यास तयार नसतानाच्या काळात राम मंदिरासाठी ज्यांनी लढा उभारला, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, िवहिंपचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस तसेच महंत अवैद्यनाथ यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी बुधवारी येथे पत्रपरिषदेत केली.
अगदी सुरुवातीच्या काळात राम मंदिरासाठी कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. अशा काळात या चौघांनी हिंदू जनजागरण करत अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी वातावरणनिर्मिती केली. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात यावा, असे तोगडिया म्हणाले. अयोध्येत राम मंदिर बांधताना त्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मारक बांधण्याची आठवण मीपणा करणाऱ्यांनी ठेवावी, असा टोला तोगडियांनी मोदींचे नाव न घेता लावला.
मुस्लिमांची ढाल करून हिंदू जनजागरण शाहीनबागेत मुस्लिमांची ढाल करून हिंदू जनजागरण करण्यात येत आहे. कारण भाजप आता हिंदू जनजागरण करू शकत नाही, असा आरोप तोगडियांनी केला. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या घरी मुल्ला-मौलवींची बैठक झाल्यानंतर शाहीनबाग आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाच्या बदल्यात देशातील तीन कोटी बांगलादेशी घुसखोरांना अभय देण्यात आले, असा स्पष्ट आरोप तोगडियांनी केला. एनआरसी देशभर नाही, हे नरेंद्र मोदींचे वक्तव्य यातूनच आले आहे, असे ते म्हणाले. शाहीनबागच्या आडून हिंदुत्वाचे मार्केटिंग करण्यात येत असल्याचा आरोप तोगडियांनी केला.
Post a Comment