खासदार निलेश लंकेंचे आंदोलन विधानसभेत गाजले; 'त्या' मागण्यांवर आ. जयंत पाटील यांची मोठी मागणी

 


माय नगर वेब टीम 

अहमदनगर :   संपूर्ण कर्जमाफी, दुध दरवाढ, शेतीमालाला हमीभाव यासाठी कायमस्वरूपी कायदा हवा अशीही लंके यांची मागणी असून लंके यांच्या नेतृत्वाखाली नगर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आंदोलकांची समजुत घातली असून काही कालखंडानंतर हे आंदोलन पुन्हा होणार आहे. त्यामुळे या प्रश्‍नी सरकारने सत्वर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. 

        यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, कांदा व दुधाला भाव नसल्याने खासदार नीलेश लंके यांनी नगर येथे धरणे आंदोलन केले. पालकमंत्री आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खा. लंके यांना आश्‍वस्त केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतू मुळ मुद्दा असा आहे की, दुधाचा उत्पादन खर्च हा ४० रूपयांपर्यत गेला असून दुधाला हमीभाव असावा यासाठी सरकारने विशेष कायदा करावा अशी खा. नीलेश लंके यांची मागणी आहे. १० हजार टन दुध पावडर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भात दुग्धविकास मंत्र्यांनी हा निर्णय स्थगित करण्यात आल्याचे आंदोलकांना सांगितले. दुध उत्पादक, कांदा उत्पादक यांना संरक्षण देण्यासाठी कायद्याने आधारभूत किंमत ठरवावी, त्याखाली जर दर गेले तर भरपाई देण्याची व्यवस्था राज्य सरकारकडून असावी अशी खा. लंके यांची मागणी असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post