धक्कादायक; जमीन व्यवहारातून शेतकर्‍याची 30 लाख रूपयांची फसवणूक

 


माय नगर वेब टीम 

अहमदनगर  - जमीन व्यवहारातून बारामती तालुक्यातील शेतकर्‍याची सुमारे 30 लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. रूपीचंद किसनराव जगताप (वय 36 रा. चोपडच, ता. बारामती, जि. पुणे) असे फसवणूक झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

या प्रकरणी त्यांनी बुधवारी (24 जुलै) सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून पती - पत्नी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील धोंडीबा कोतकर व त्याची पत्नी सुनीता सुनील कोतकर (दोघे रा. हनुमाननगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती - पत्नीची नावे आहेत. सदरची घटना 6 मार्च 2024 ते 12 एप्रिल 2024 दरम्यान घडली असून जगताप यांनी पोलिसांकडे केलेल्या अर्जाची चौकशी करून या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 143/1 प्लॉट 76/77/78 मधील जागेत बांधलेले रो- हाऊस तुमच्या नावावर करून देईल असे आश्‍वासन देऊन कोतकर दांपत्यांनी जगताप यांच्याकडून सुमारे 30 लाख रूपये 11 महिन्यासाठी घेतले होते.

दरम्यान, जगताप हे कोतकर दांपत्याकडे पैशाची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांनी पैसे दिले नाही. उलट पैशाची मागणी केल्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जगताप यांनी सुरूवातीला पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीसाठी कोतवाली पोलिसांकडे केला. पोलिसांनी अर्ज चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post