पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप ऍक्शन मोडवर ; महापालिकेला केले असे आवाहन...



पुणे, मुंबई, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

माय नगर वेब टीम 

अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर स्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगर शहरातील सीना नदीला देखील गतवर्षी पूर येऊन मोठ्या संख्येने नागरिकांचे नुकसान झाले होते. अनेक घरांत पाणी शिरले होते. नगर शहरात देखील पावसामुळे पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सज्ज राहत आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा आशयाचे पत्र आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नगरमध्येही दररोज पाऊस हजेरी लावत आहे. नगर शहरातून वाहत असलेल्या सीना नदीला गतवर्षी पूर येऊन पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले होते. यामुळे नागरिकांचे नुकसान होऊन त्रास सहन करावा लागला. नागरिकांचे नुकसान होऊ नये, नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात.

नगर शहरात दररोज होत असलेल्या पावसामुळे साथीचे आजार बळावण्याची दाट शयता निर्माण झाली आहे. पाणी साचून राहत असलेल्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. शहर व उपनगरांत अंतर्गत काही रस्त्यांवर पडलेल्या खडड्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी. जुनी व धोकादायक झाडे काढण्यात यावीत. आपत्ती उद्धभवल्यास बचावकार्यांसाठी आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात यावी असे आ. जगताप यांनी पत्रात म्ह्टले आहे.


ओढे, नालेे, बंदिस्त प्रवाह मोकळे करा

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नाले व गटार साफ सफाई करणे आवश्यक आहे. त्याबाबत यापूर्वीही महापालिका प्रशासनाला वारंवार सुचना दिलेल्या आहेत. यंदा महापालिका प्रशासनाने नाले साफसफाईची मोहिम राबविली. परंतु, काही ठिकाणी ओढे नाल्यांची साफसफाई झाल्याचे दिसून येत नाही. जास्त पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तातडीने पाणी जाण्यास अडथळा निर्माण करणारे प्रवाह मोकळे करण्यात यावेत.


साथीच्या आजारांत वाढ

सध्या पावसाळ्याचे दिवस असून पाऊस दररोज हजेरी लावत आहे. पावसामुळे शहरात व उपनगरांत रस्त्यालगत पाणी साचत आहे. या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असून त्यामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच साचून राहिलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे, डासांमुळे साथीचे आजार वाढले आहेत. नगरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post