नगर शहरातील उड्डाणपूलाची खा.लंके यांच्याकडून पहाणी; निकृष्ठ कामाबद्दल नाराजी व्यक्त



सखोल माहिती घेवून चौकशी करणार

माय नगर वेब टीम 

अहमदनगर  :  नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावरून एक मोठा आयशर ट्रक थेट खाली कोसळल्यामुळे काल घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर काही लोक गंभीररित्या जखमी झालेले आहेत.आज खा.नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पूलाची पहाणी करून निकृष्ठ कामाबाबत नाराजी व्यक्त केली.

        नगरचा उडडाणपूल झाल्यापासून अपघाताची मालिका सुरुच आहे.हा पूल निकृष्ठ दर्जाचा झाल्याने मृत्यूचा सापळाच बनला आहे.या कामाची चौकशी करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकवेळा केली आहे.मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याने

अपघातांची संख्या वाढत आहे.

       कालदेखील उड्डाणपूलावर मोठा अपघात घडला.या घटनेवरून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आक्रमक झाले आहेत. या उड्डाण पुलाच्या दोषपूर्ण कामासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी, ठेकेदार, राजकीय नेते यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची जाहीर मागणी काळे यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारकडे केली आहे. हा उड्डाणपूल म्हणजे मृत्यूचा सापळा झाला असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

       किरण काळे यांनी म्हटले आहे की, यापूर्वी देखील या उड्डाण पुलावर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक लोक गंभीरित्या जखमी झाले असून काहींना प्राण गमवावे लागले आहेत. हा उड्डाणपूल म्हणजे आता मृत्यूचा सापळा झाला आहे. मुळात या पुलाचे काम करताना इंजीनियरिंगच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या बाबींची योग्य ती पूर्तता करण्यात आलेली नाही. काम देखील निकृष्ट रित्या करण्यात आले आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांना मात्र हाती काहीच आलेले नाही. काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाचा एक मोठा भाग भाग कोसळून खाली पडल्यामुळे शहरातील एका चार चाकी चालकाचा अपघात पुलाखाली झाला होता. त्यावेळी चार चाकी असल्यामुळे सदर व्यक्ती बालमबाल वाचली होती.हा सिलसिला काही थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे नगरकरांमध्ये या उड्डाणपूला वरून व खालून देखील जाण्याबाबत मोठी भीती मनामध्ये निर्माण झाली आहे.

        खा.नीलेश लंके हे पोलीस प्रशासनाविरोधात गेल्या चार दिवसांपासून नगर येथील पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.आज उपोषण सुटताच त्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत जावून उड्डाणपूलाची पहाणी करून निकृष्ठ कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.दरम्यान संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या कामाची सखोल चौकशी करणार असल्याचेही खा.लंके यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post