काळकुपकरांनी साकारला नदीजोड प्रकल्प! ; एक हजार एकर जमीन ओलिताखाली...



ग्रामस्थांच्या एकीच्या वज्रमुठीचे दर्शन 

माय नगर वेब टीम 

पारनेर :    काळकुपच्या ग्रामस्थांनी एकत्र येत खासदार नीलेश लंके यांच्या सहकार्यातून साकारलेल्या अनोख्या नदीजोड प्रकल्पामुळे एक हजार जमीन ओलीताखाली येणार आहे. खा. लंके यांच्या उपस्थितीत ही योजना कार्यान्वीत करण्यात आली.  

     काळकुप जवळून कापरी नदी वाहत असतानाही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नव्हता. या नदीचे वाहून जाणारे पाणी गावातील मध्यवर्ती असलेल्या तलावामध्ये आणणे आवश्यक होते. गावातील तलाव कधीतरी भरत असल्याने तलाव असूनही त्याचा फारसा फायदा  होत नव्हता. कै. भागाशेठ खरमाळे यांनी या नदीजोड प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. त्यांच्या पश्‍चात सरपंच ताराबाई कदम सरपंच झाल्यानंतर आपल्या कुटूंबाला सरपंचपदाचा मान दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या ॠणातून उतराई होण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची मोहीम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. 


१ हजार ७५० मिटर पाईपलाईन

नदीजोड प्रकल्प पुर्ण करण्याचा विडा उचलण्यानंतर या कामासाठी मोठा खर्च अपेक्षीत होता. सरपंच कदम यांचे चिरंजीव भागाशेठ कदम यांनी बंधाऱ्यापासून नदीपर्यंतचे १ हजार ७५० मीटर पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले. 


खा. लंके यांची मदत व मार्गदर्शन 

पाईप अस्तरीकरणासह मोठया पाईपची या प्रकल्पासाठी आवश्यकता होती. ही संकल्पना खा. नीलेश लंके यांच्यासमोर मांडण्यात आल्यानंतर त्यांनी पाईपअस्तरीकरण तसेच मशीनरीसाठी  मदत व मार्गदर्शन केले.  

७१ लाखांचे अंदाजपत्रक

या योजनेसाठी ७१  लाख  रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. भागाशेठ कदम यांनी १२ ते १३ लाख रूपयांच्या मदतीचे योगदान दिले. ग्राम निधीतून २ लाख ७५ हजार, लोकवर्गणी ५ लाख ५० हजार, वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे संतोष चौधरी यांनी इटन कंपनीकडून १८ लाख रूपयांची मदत मिळवून दिली. भाऊसाहेब खरमाळे, राजेंद्र कदम, किसन शिंदे, मच्छिंद्र खरमाळे, पांडूरंग कदम, आबासाहेब मते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी या कामात महत्वाची भूमिका बजावली. 


काळकुपकरांची एकजुट  

गावाला सुजलाम सुफलाम करणारे हे जलमंदिर उभे करण्यासाठी गावाने एकजुट दाखविली. खा. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत ही योजना कार्यान्वीत करण्यात आली. या प्रकल्पामुळे एक हजार एकर क्षेत्र ओलीताखाली येणार असून गाव एकत्र आले आणि त्यास योग्य नेतृत्व आणि मार्गदर्शनाची जोड लाभली की गावाचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही हे काळकपुकरांनी कृतीतून सिध्द केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post