...तर भाजपमध्ये येवून फडणवीसांची अडचण दूर करा!; श्रीराम गणपुले यांचा आ. थोरातांना सल्ला



माय नगर वेब टीम 

संगमनेर : आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  एवढीच काळजी असेल तर  तुम्ही भाजपमध्ये येवून त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचाही मार्ग मोकळा होईल असा उपरोधिक  सल्ला भाजपाचे शहर अध्यक्ष अॅड श्रीराम गणपुले यांनी आ.बाळासाहेब थोरात यांना दिला.


भारतीय जनता पक्षामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आल्याचे वक्तव्य आ.थोरात यांनी केले याबाबत श्रीराम गणपुले यांनी  सल्ला देवून फडणवीस यांची अडचण दूर करण्यासाठी आ.थोरात यांना थेट भाजपा मध्येच येण्याचे आवाहन केले.


सोयीनूसार राजकारण करण्याची आ.थोरात यांची निती संपूर्ण राज्याने पाहीली आहे.एकीकडे काँग्रेसचा निष्ठावान  म्हणून मिरवून घ्यायचे आणि दुसरीकडे स्वताच्या राजकीय  फायद्यासाठी भाजपाच्या नेत्यांची हातमिळवणी करायची तेव्हा भारतीय जनता पक्ष त्यांना अडचणीचा वाटत नाही. स्वता:चा भाचा अपक्ष उभा करायचा, त्याच्यासाठी भाजपाचा पाठींबा घ्यायचा, शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार उभा करायचा, त्याला संस्थात्मक सर्व रसद पुरवायची, सगे-सोयऱ्यांचे राजकारण करुन जिल्ह्यात व पक्षात वजन असल्याचा खोटा आव आणायचा हे सर्व करणाऱ्या बाळासाहेब थोरातांनी आपल्या पक्षातील झालेली दुर्दशा सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे सोडून देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्ष यांची काळजी करणे म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि लोकाचं पहायचं वाकून असा प्रयोग असल्याची टिका गणपुले यांनी केली.


 आ.थोरातांना  भाजपाची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या निवडणूकीच्या तोंडावर अचानक काळजी वाटायला लागणे आणि देवेंद्रजींवर अन्याय झाल्याचे वाटणे हे अचानक घडले नाही अशी शंका आहे. 


मागील वर्षभर पुढे केलेल्या मुलीची संभाव्य आमदारकी धोक्यात आल्याचे तर हे लक्षण नाही ना अशीही शंका त्यांच्या वक्तव्यांतून येवू लागली आहे. उघडपणे वैचारीकबदल न स्विकारता तात्पुरत्या तडजोडीं मधून स्वता:ची बाजू सुरक्षित करुन घेण्याचा आणि देवेंद्रजींसाठी खोटी सहानूभुती दाखवून मुलीचे राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याचा हेतू दिसतो. देवेंद्रजी एवढी काळजी बाळासाहेब थोरातांना होती व आहे तर २०१९ सालात देवेंद्रजींना दगाफटका करुन, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसविताना १०५ घरी बसविल्याचा १०८ वेळा जप करुन असूरी आनंद का व्यक्त केला? हे तथाकथित संभावित सुसंस्कृतपणाचा बुरखा पांघरुन हिंडणाऱ्या थोरातांनी स्पष्ट करावे.


 २०१९ मधले बाळासाहेब थोरात खरे की २०२४ मधले बाळासाहेब थोरात खरे याचाही खुलासा संगमनेरच्या आम जनतेला आता हवा आहे. अन्यथा आपले पडझड झालेले काँग्रेसचे घर सावरावे असे आव्हान देवून  देवेंद्रजींना बाळासाहेब थोरातांच्या दाखल्याची अगर सहानुभूतीची गरज नाही. ते कट्टर विचाराधारेशी बांधिल असलेले नेते आहेत. हे त्यांनी त्यांच्या २०१४ पासूनच्या कर्तबगारीने सिद्ध केले आहे. पक्ष देईल ती जबाबदारी आणि पक्ष ठरवेल ती पुर्वदिशा  मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या परंपरेतल्या देवेंद्रजी फडणवीस यांना बाळासाहेब थोरातांच्या पुतना मावशीच्या प्रेमाची गरज नसल्याचे गणपुले यांनी ठणकावून सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post