महायुती सरकारने केली अहिल्यानगर नामांतराची वचनपुर्ती : ना. विखे पाटील



माय नगर वेब टीम 

अहमदनगर:  अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या मागणीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित आज शिक्कामोर्तब झाले. नामंतराच्या या  प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे. नामांतराच्या या निर्णयाचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीदिनास तिनशे वर्ष पूर्ण होत असतानाच   हा निर्णय होणे ही एक   ऐतिहासिक घटना असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.    

गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव देण्यात यावे अशी मागणी सातत्याने होत होती. चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही नामांतराच्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी देण्याचे विनंतीपत्र दिले होते. यापुर्वी रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर नावाला कोणतेही हरकत नसल्याचे राज्य आणि जिल्हा प्रशासनाला कळविले होते. 

केंद्र सरकारने अहिल्यानगर नामांतराच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयाबद्दल महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आनंद व्यक्त केला. नामांतर होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. हा निर्णय होण्यासाठी योगदान देता आले याचा आनंद आहे. महायुती सरकारने दिलेल्या शब्दांची वचनुर्ती केल्याचेही त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post