संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील



एकरूखे गावातील विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन

माय नगर वेब टीम 

शिर्डी :- गारपीट, अवकाळी, दुष्काळ अशा विविध संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अनुदानाचे वेळोवेळी वितरण केले आहे. यापुढेही संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

राहाता तालुक्यातील एकरूखे गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अहिल्यानगर जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, नायब‌ तहसीलदार हेमंत पाटील, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता काशीनाथ गुंजाळ, भूमिअभिलेख अधिकारी योगेश थोरात, एकरूखे सरपंच जितेंद्र गाढवे पाटील आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकाला फायदा झाला पाहिजे यासाठी शासन योजना राबवित आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना ऑक्टोंबरपर्यंतचे अनुदान वितरित झाले आहे. यापुढे ही योजना बंद होऊ न देता याऊलट योजनेच्या अनुदानात वाढ केले जाईल. 

मुख्यमंत्री बळीराजा योजनेतून शेतकऱ्यांचे कृषी वीज बील माफ करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १२२ कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. सोयाबीन अनुदान व दूध अनुदानाचे पैसेही शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे. मुलींना उच्च व्यावसायिक शिक्षण मोफत करण्यात आले आहे. 

एसटी भाड्यात महिलांना दिलेल्या पन्नास टक्के सवलतीमुळे तोट्यातील एसटी फायद्यात आली‌ आहे.  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा योजनेत येत्या १७ तारखेला जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेने अयोध्या यात्रेला पाठविण्यात येणार आहे, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

शिर्डी एमआयडीसीत डिफेन्स कलस्टरच्या माध्यमातून एक हजार कोटींची गुंतवणूक तसेच येत्या काळात २४ औद्योगिक प्रकल्प  याठिकाणी येणार आहेत. शिर्डीत 'साईबाबा थीम पार्क' साकार होणार आहे. शिर्डी विमानतळाचे विस्तारिकरण होत आहे. अशा विविध कामांमुळे राहाता तालुक्यातील १० हजार तरूणांना नवीन रोजगार उपलब्ध होणार आहे.,असेही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले. 

आण्णासाहेब म्हस्के पाटील, जितेंद्र गाढवे पाटील यांची यावेळी भाषणे झाली.

जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' नामांतराचा ऐतिहासिक निर्णय, एक रूपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून एकरूखे गावातील शेतकऱ्यांना २ कोटी ९७ लाखांचे अनुदान व शिर्डी येथे एमआयडीसी उपलब्ध करून दिल्याबद्दल एकरूखे गावांतील सर्व समाजबांधव, ग्रामस्थ व शेतकरी यांच्यावतीने पालकमंत्र्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 


यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच महिला बचतगटांतील प्रत्येकी एका महिलेस फुड प्रोसेसिंग युनिटचे वाटप करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते एकरूखे गावातील ८ कोटी ४२ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यात अहिल्यानगर जिल्हा परिषद, संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक पर्यटन विकास सन २०२३-२४ व 'क' वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजना सन २०२३-२४ व २०२४-२५ अंतर्गत एकरूखे येथील वज्रेश्वरी माता मंदिर परिसर सुशोभीकरण कामांचा समावेश आहे.

प्रास्ताविक देवेंद्र फवर यांनी केले. 


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post