कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

 


माय नगर वेब टीम

अमरावती : महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक वादग्रस्‍त वक्तव्य केले आहे. हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.


अमरावतीमध्ये ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली होती. मात्र, काही लोकांनी त्याचा गैरउपयोग केला. पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे, त्याचा योग्य लाभ शेतक-यांना मिळाला पाहिजे. पीक विमा योजनेबाबत चांगले-वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहेत. पीक विमा कंपन्या शेतक-यांची लुटमार करतात.


सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही. पीक विमा योजनेत सुधारणा करायची आहे. पीक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले. पीक विमा योजनेत अशाप्रकारचे गैरप्रकार झाले आहेत की, बाकीच्या राज्यातील लोकांनी ऑनलाईन अर्ज केले.


त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोफावले, त्यातून असे वाटत आहे की पीक विमा खूपच चांगली योजना आहे की काय. पण प्रत्यक्ष चौकशी केल्यावर आम्हाला कळले की आम्ही 4 लाख अर्ज नामंजूर केलेत. सरकार त्यामध्ये कुठेही अडचणीत आलेले नाही. पण अशा पद्धतीने लोक अर्ज भरतात, कुठेतरी एजन्सी केंद्रवाले हे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरु आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post