माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला आहे. मात्र यंदा स्पर्धेदरम्यान अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. महाराष्ट्र स्पर्धेच्या सामन्यात पैलवान शिवराज राक्षे याने पंचांशी वाद घालत मारहाण केली. हीच हुज्जत घालणे आणि मारहाण करणे पैलवन शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना चांगलेच भोवलं आहे. या दोनही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही स्पर्धेत झालेल्या गोंधळानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि शिवीगाळ केली. तर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडले. त्यावेळी त्याने पंचांना शिवीगाळही केली. यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोनही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.
कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी या घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. याविषयी माहिती देताना त्यांनी, “पंचांनी जो निर्णय दिला होता त्याच्याविरोधात पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी खिलाडूवृत्तीने खेळायला पाहिजे होते. त्यांनी पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे हे चुकीचे कृत्य केले. त्यामुळेच शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडने पंचांसोबत वाद केला आणि शिवीगाळही केली. हे एका खेळाडूला शोभणारे नाही. त्यालाही तीन वर्षे कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.” असे म्हणत मोठा निर्णय दिला.
शिवराज राक्षेने पंचांना शिवीगाळ करत लाथ मारली
मॅट विभागामधून महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांचा कुस्तीचा सामना सुरू असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे या चितपट केले होते. मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्याने त्याने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडला होता. यावेळी त्याठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला.
महेंद्र गायकवाडची नाराजी
दुसरीकडे, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळला दुसरा गुण दिल्यानंतर त्याविरोधात महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप पंचांनी केला. तसेच महेंद्र गायकवाडने मैदान सोडले आणि त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी केलेल्या या कृत्याचा सर्व पंचांनी निषेध व्यक्त केला. या घटनेच्या निषेधार्थ सर्व पंचांनी एकत्र येत संपूर्ण सामने संपल्यानंतर बैठक घेतली. त्यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत या दोन्ही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
Post a Comment